हा अजूनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. थोरल्या महाराजांनी गडाची पुनर्बांधणी केली आणि एक प्रबळ लष्करी ठाणे बनविले. दुर्देवाने हा गड पुन्हा अदिशहाच्या ताब्यात गेला.
१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला जिंजीवरून परत येताना, छत्रपती राजाराम महाराज या गडावर काही सरळ वास्तव्यास होते. अठरावे शतक सरताना, परशुरामभाऊ पटवर्धनांनी हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर १० वर्षांनी करवीरकर छत्रपतींनी हा किल्ला जिंकून घेतला.
१८४४ साली कोल्हापूर संस्थानात झालेल्या बंडात ह्या गडावरील शिंबदीने भाग घेतला होता. बाबाजी आयेरकर हा शूर गडकरी त्यावेळी होता, त्याला सुभाना निकम याने आपल्या ३०० साथीदारांसह उत्तम साथ दिली होती. इंग्रजांनी यावेळी डागलेल्या तोफांनी गडाचा मुख्य दरवाजा आणि तटबंदीचा भाग जमीनदोस्त झाला होता. पहाण्याची ठिकाणेपेठ शिवापूर गावातून डांबरी सडक भुदरगडावर जाते. वाटेत महादेवाचे मंदीर आणि त्या समोर असलेला सुबक नंदी लागतो. या मार्गाने गडावर पोहचताच उजव्या हाताला भैरवनाथाचे वेगळ्या धाटणीचे हेमाडपंथी मंदीर दिसते. मंदीराभोवती ओवर्या, कमानी आणि दिपमाळा आहेत.
मंदीरासमोरील तटबंदी असलेल्या बुरूजावर ध्वजस्तंभ असलेल्या बुरूजावर ध्वजस्तंभ आणि तोफ आहे. देवळामागील वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाड्यात गडसदरेचे अवशेष आहेत. वाड्याच्या गडसदरेचे अवशेष आहेत. वाड्याच्या पलिकडे करवीरकर छत्रपतींनी जिर्णोध्दार केलेले पुरातन शिवमंदीर आहे. सभा मंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापित केला आहे. मंदिर मुक्कामासाठी योग्य आहे. वाड्याजवळील पायवाटेने पुढे गेल्यावर भुदरगडचे वैभव असलेला बांधीव दुधसागर तलाव लागतो.
यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे झाले आहे. तलावशेजारी भग्नावस्थेतील भवानी मंदीर मंदिरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मूर्ती आहे. तलाव उजव्या हाताला ठेवून काठाने पुढे गेल्यावर गुहेत असलेले आणि गुहेच्या बाहेर सभा मंडप असलेले मंदिर लागते. मंदिरात अनेक देवतांच्या मूर्ती दिसतात.
तेथून झाडीतून मळलेल्या वाटेने उत्तरेकडे पुढे गेल्यास, आपण एका छोट्या तलावाजवळ येतो. त्या ठिकाणी समाध्या आहेत. या ठिकाणी गडाची उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे. तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता, आपणास गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते. पुन्हा माघारी दुधसागर तलावाजवळ यायचे तलाव जेथे संपतो, तेथे डाव्या हातास महादेवाचे सुबक नक्षीकाम असलेले मंदिर दिसते.
पूर्वेकडच्या सरळ वाटेने पुढे गेल्यास नामशेष झालेले गडाचे पुढे गेल्यास नामशेष झालेले गडाचे प्रवेशव्दार आहे. दोन्ही बाजूनी दगड लावलेल्या वाटेने खाली उतरल्यावर एक भलीमोठी चौरस शिळा आणि या शिळेत कोरून काढलेली १०० चौफूटांची खोली (पोऱप धोंडी) दिसते. येथून पुन्हा माघारी आल्यावर प्रवेशव्दाराच्या बाजूला एक नंदी दिसतो. त्यासमोर जमिनीच्या पोटात खोदून काढलेले भुयार आहे. भुयाराच्या पायऱ्या उतरून आत गेल्यावर अन्य मूर्त्यांसोबत जखुबाइची शेंदरी मूर्ती दिसते.
जागोजागी जिने असलेल्या पश्चिम तटबंदीवर चढायचे आणि भैरवनाथ मंदिरापर्यंत चालत जायचे. त्या ठिकाणी तटबंदीत आणखी एक बुजलेला दरवाजा दिसतो. गडावर चिऱ्याच्या कोरड्या पडलेल्या २ विहिरी आणि दोन तलाव आहेत. परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे.
पोहोचण्याच्या वाटा :-
- कोल्हापूरहून गारगोटीला जाणाऱ्या अनेक एसटी बसेस आहेत. गारगोटी वरून पाल नावाच्या गावात जायचे, अंतर साधारण ५ कि.मी आहे. तिथपर्यंत जाण्यास खाजगी वहाने मिळतात. पालपासून पेठशिवापूर साधारण अर्धा तासाचे अंतर आहे. स्वत:चे वहान असल्यास आपण वाहन थेट भुदरगडावर घेऊन जाऊ शकतो.
- स्वत:चे वाहन असल्यास गारगोटी-पुष्पनगर-शिंदेवाडी मार्गे राणेवाडी मार्गे पेठशिवापूर-भुदरगड गाठता येते.
जेवणाची सोय :- गडावर जेवणाची व्यवस्था नाही.
राहण्याची सोय :- भैरवनाथ मंदिर मुक्कामासाठी योग्य आहे.
पाण्याची सोय :- गडावर चिऱ्याच्या कोरड्या पडलेल्या २ विहिरी आणि दोन तलाव आहेत. परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे. गडावर पिण्याच्या पाण्यासाठी भैरवनाथ मंदिराच्या मागे हातपंप आहे.